चेन्नईने दिला मुंबईला धक्का

नशीब हे धाडसी लोकानाच साथ देते अशा स्वरूपाची एक म्हण प्रचलित आहे. या म्हणीचा प्रत्यय नुकताच आला. केवळ नशीबाची साथ मिळाल्याने ‘प्ले ऑफ’मध्ये स्थान मिळालेल्या चेन्नई सुपर किंग्जने एलिमेटरच्या निर्णायक सामन्यात सुरूवातीपासून चाचपडत खेळ करणार्‍या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. यामुळे जिगरबाज खेळणार्‍या चेन्नईला गेल्यावर्षीप्रमाणे शेवटच्या क्षणी आयपीएलच्या पाचवे सीझन जिंकण्याची संधी चालून आली आहे.

गतवर्षीही चेन्नई संघाला शेवटच्या क्षणी नशीबाने साथ दिल्याने प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळाला होता. त्याचा फायदा घेत चेन्नईने आयपीएलचे विजेतेपद पटकाविले होते. त्यामुळे यावर्षीही शेवटच्या चार संघात प्रवेश मिळण्यास त्यांना नशीबाची साथ मिळाली आहे. त्यांचे व बेंगळरू रॉयल चॅलेंजर्सचे समान १७ गुण असताना चेन्नईचा रनरेट चांगला असल्याने प्ले ऑफ मध्ये शेवटच्या क्षणी प्रवेश मिळाला. बेंगळरू रॉयल चॅलेंजर्सला शेवटच्या सामन्यात जर डेक्कन चर्जिसने पराभुत केले नसते तर गणिते वेगळी राहिली असते.

आतापर्यंताचा इतिहास पाहता जर तर च्या बाबतीत नेहमीच कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांचे नशीब बलवान ठरले आहे. त्यामुळे त्याचा फायदा घेत आतापर्यंत धोनीने आपली क्रिकेट जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

मुंबई विरुद्ध झालेलया एलिमेटरच्या पहिल्याच लढतीत चेन्नईने जिगरबाज खेळ करीत मुंबईला डोके वर काढण्याची संधीच दिली नाही. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नईला धवल कुलकर्णीने दोन झटके दिले त्यावेळी २ बाद १ अशी अवस्था झाली होती. त्यातुन हसी व बद्रीनाथने मार्ग काढत दोघांनी चेन्नईला शतकापर्यंत नेवून पोहचवले. यानंतर दोघेही बाद झाले.  निर्णायक क्षणी महेंद्रसिंग धोनी व ज्वेन ब्राव्हो यांनी तुफानी फटकेबाजी करीत मुंबईच्या गोलंदाजीची धुलाई केली. शेवटच्या २९ चेंडूवर ७३ धावाची भागीदारी केली. आणि हीच भागीदारी मुंबईच्या विजयातील अडथळा  ठरवली सुरूवातीच्या पाच षटकात ४७ धावा करून सचिन-स्मिथने दमदार सुरूवात केली. पण सचिन धावबाद झाल्यानंतर मुंबईच्या एकाही फलदांजानी पीचवर उभारण्याचे धाडस दाखवले नाही. त्यामुळे १८८ धावाचा पाठलाग करताना मुंबईला १४७ धावापर्यंतच मजल मारता आली.

आतापर्यंतच्या पाच आयपीएल स्पर्धेत मुंबईचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. प्रत्येक स्पर्धेप्रमाणे मुंबईची सुरूवात अडखळतच झाली. मात्र पुन्हा त्यांना थोडक्यात विजय मिळत गेल्याने त्यांनी उपांत्यफेरी पर्यंत मजल मारली. पण त्यांना नेहमीप्रमाणे विजेतेपदापर्यंत जाता आले नाही.

Leave a Comment