धोनीचा पुन्हा कस लागणार

आयपीएल स्पर्धेतील नशीबाच्या जोरावर महेंद्रसिंग धोनीचा आतापर्यंतचा प्रवास यशस्वी ठरला आहे. मात्र आगामी काळ हा त्याची सत्वपरीक्षा पाहणारा ठरणार आहे. ऑगस्ट, सप्टेंबर पासून पुन्हा क्रिकेटचा हंगाम सुरू होत असून टवेंटी २० चा विश्वचषक न्युझीलंड, इंग्लंड, व ऑस्ट्रेलिया भारत दौर्‍यावर येत असून त्यांचा मुकाबला कर्णधार म्हणून धोनी कसा करणार यावरच त्याचे पुढील भवितव्य अवलंबून राहणार आहे.

एप्रिल २०११ साली भारताने २८ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर विश्वचषक जिंकला त्याचे  श्रेय कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीला देण्यात आले. त्यापूर्वी त्याने टवेंटी २० विश्वचषक व भारतीय संघाला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावून दिले होते. त्यामुळे सर्वत्र धोनीच्या नावाचा बोलबाला होता.

त्यानंतर २०११ साली झालेले दोन दौरे मात्र भारतीय संघाच्या अपयशी मालिकामुळे विसरता येत नाहीत.काही दिवसांपूर्वीच विश्वचषक जिंकल्याने संपूर्ण भारतीयांनी डोक्यावर घेतलेल्या धोनी ब्रिग्रेडला नावे ठेवण्यास सुरवात केली. गेल्यावर्षी झालेल्या इंग्लंड दौर्‍यात भारतीय संघाला कसोटी मालिकेत ४-० असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे भारतीय संघाची नाचक्की तर झालीच मात्र या पराभवाचे खापर कर्णधार म्हणून धोनीच्या नावे फोडण्यात आले.

या सगळ्यातून कर्णधार म्हणून धोनी बाहेर पडेल असे वाटत होते. मात्र ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही भारतीय संघाची ही अपयशाची मालिका खंडीत झाली नाही. ऑस्ट्रेलिया दौर्‍यातही सपाटून मार खावा लागल्याने संघाच्या कामगिरी बाबतच प्रश्न निर्माण झाला होता. अशियाई मालिकेवेळी धोनीचे कर्णधारपद जाते का अशी परिस्थिती होती मात्र त्याला कर्णधारपद दिल्याने त्यातून तो सुटला.

खर्‍या अर्थाने आता आगामी काळात आयपीएल नंतर होणार्‍या सर्वच सामन्यात त्याच्या नेतृत्चाचा कस लागणार आहे. त्यामुळे धोनीला आगामी न्युझिलंड, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया दौर्‍यात सांधिक कामगिरी उंचवावी लागणार आहे. अन्यथा कर्णधार पद गमवावे लागणार असल्याने आगामी काळ हा त्याच्या दृष्टीने सत्वपरीक्षा पहाणारा ठरणार आहे.