आमीर सोबत काम करण्यात अडचण नाही – रामगोपाल वर्मा

मुंबई, दि. १४ – दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आणि अभिनेता आमीर खानमध्ये बिनसल्याची चर्चा सध्या रंगली आहे. परंतु, आमीर आणि आपल्यात सर्व काही ठीक असल्याचा निर्वाळा रामगोपाल वर्मा यांनी दिला आहे. ‘आमिरसोबत काम करण्यात आपल्याला कोणतीही अडचण नाही. एखादी चांगली पटकथा मिळाली, तर आम्ही नक्कीच एकत्र काम करू’, असे वर्मा म्हणाले.
    रामगोपाल वर्मांच्या १९९५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगीला’ चित्रपटात आमीर पहिल्यांदा झळकला होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला. मात्र त्यानंतर दोघांनी एकत्र काम केले नाही. दिग्दर्शनाच्या कामात आमीर हस्तक्षेप करीत असल्यामुळे रामू नाराज असल्याची अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. त्यानंतर आमीर सोबत आपण पुन्हा काम करणार नसल्याचे रामूने सांगितले होते. त्यावर आमीरने मिश्किल प्रतिक्रीया व्यक्त करीत, ‘जर रामूला आपल्यासोबत काम करायचे नसेल तर ते आपले सुदैव आहे,’ असे म्हटले होते.    
    आमीर सोबत काम करून आता १६ वर्षे झाली, तरीही तुम्ही अजून एकत्र आला नाहीत, यामागे काय कारण आहे, असे रामगोपाल यांना काही पत्रकारांनी छेडले. त्यावर ते म्हणाले, ‘मी एका विशिष्ट कलाकाराला समोर ठेवून पटकथा लिहित नाही. केवळ अमिताभ बच्चनच याला अपवाद आहेत. लहानपणापासूनच आपण बच्चन यांचे मोठे चाहते आहोत. बच्चन यांनी रामगोपाल वर्मांच्या सरकार, सरकार राज, रामगोपाल वर्मा की आग आणि निःशब्द अशा चित्रपटांत काम केले आहे. या आठवडयात रामगोपाल यांचा ‘डिपार्टमेंट’ चित्रपट प्रदर्शित होत आहे. ज्यामध्ये अमिताभ बच्चन यांनी एका राजकारण्याची भूमिका साकारली आहे. संजय दत्त देखील या चित्रपटात अमिताभ यांच्यासोबत दिसणार आहेत.

Leave a Comment