मी बदललोय, बदलतोय- आमीर

आपल्या पहिल्यावहिल्या रिअॅलिटी शो द्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत असलेला आमीर बदलतोय. होय, आमीरने स्वतःच हे कबूल केलेय. परफेक्शनिस्ट आमीर बदलतोय म्हणजे काय? अजून काय परफेक्शन हवेय त्याला?

आमीर सांगतोय ‘ सत्यमेव जयते‘ हा त्याचा रिअॅलिटी शो दर रविवारी सकाळी आठ वाजता प्रसारित होणार आहे. गेली दोन वर्षे आमीर या शो साठी शुटिंग करतो आहे आणि त्या निमित्ताने देशभरातील आपल्या देशबांधवांना तो भेटला आहे, त्यांच्याशी बोलला आहे.

त्यातून आमीरला असे जाणवले आहे की खुद्द त्याच्यातच सुधारणेला अजून खूप वाव आहे. या लोकांच्या कथा मी ऐकल्या, त्यांची सुख दुःखे त्यांच्याशी शेअर केली आणि मला जाणवले की या सर्वसामान्य लोकांनी ज्या अतुल धैर्याने त्यांच्या जीवनात भोगाव्या लागलेल्या भोगांना तोंड दिले आहे, त्यांच्याशी दोन हात केले आहेत त्यातून मला खूप शिकायला मिळाले आहे. माझ्यातच सुधारणा करायला खूप मोठा वाव आहे आणि मी बदलतोय. तसा प्रयत्न करतोय.

पूर्वी मनाविरूद्ध कांही घडले की मी नर्व्हस होत असे, लोकांशी बोलणे टाळत असे पण ही माझी चूकच होती हे मला उमगले आहे. या सर्वसामान्य लोकांनीच मला त्यांच्या वर्तणूकीतून प्रेरणा दिली आहे. त्यांच्या कथा ऐकताना मी अनेकवेळा ढसाढसा रडलोय, व्याकुळ झालोय. त्यांचे अनुभव त्यांच्याशी शेअर करून मी खूप कांही मिळवलंय. या सर्वसामान्य लोकांनीच आमीरला अमीर केलंय. अधिक समृद्ध बनवलंय.