आमीर, मित्रा, तुझ्यासाठी कांहीही – सलमान

शोले या रेकॉर्डब्रेक चित्रपटाने जय वीरूच्या मित्रप्रेमाची महती सर्वसामान्य जनतेत रूजवली असे म्हटले तर ते गैर ठरू नये. पण सिनेमातले सगळे प्रत्यक्ष जीवनात उतरत नसते असेही म्हणतातच की! आमीर सलमान या आजच्या टॉप बॉलिवूड नायकांनी मात्र जयवीरू सारखे मित्र प्रत्यक्षातही असतात हेच सिद्ध केले आहे.

केवळ एकाच चित्रपटात एकत्र काम केलेल्या या दोघांची मैत्री फारच घट्ट आहे. जिवाला जीव देणारे मित्र अशी त्यांची ओळख आहे आणि हे नुकत्याच घडलेल्या एका घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

सत्यमेव जयते या टिव्ही शोमधून आमीर छोट्या पडद्यावर पदार्पण करतो आहे. परफेक्शनिस्ट म्हणून ख्याती असलेल्या आमीरच्या या शोचा टेलिकास्ट सुरू होण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी वाहिन्यांच्या पोटात आपला टीआरपी घसरणार म्हणून मोठा गोळा आला आहे. मग आमीरला तोडीस तोड म्हणून टिव्ही शोमधून यापूर्वीच आपले स्थान बळकट केलेल्या आणि प्रचंड टीआरपी मिळवून देणार्‍या देखण्या सलमानची आठवण या वाहिन्यांना होणे साहजिकच आहे.

आपला टीआरपी कायम राहावा म्हणून कांही वाहिन्यांच्या प्रॉडक्शन हाऊसमधील बॉसनी सलमानला त्यांच्या टिव्ही शोच्या अँकरिंगसाठी भल्या मोठ्या रकमेचे आमिष दाखविले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.  ज्या वाहिन्यांना असला जुगार खेळणे शक्य नाही त्यांनी आपल्या कार्यक्रमांच्या वेळा बदलण्याचे ठरविले असल्याचेही सांगितले जात आहे.

मात्र आमीरचा हा पहिलाच टिव्ही शो असल्याने सलमानने त्याच्यासाठी या प्रचंड आमिषाकडे पाठ फिरविली असून आमीरला स्पर्धा निर्माण करेल असा कुठलाही कार्यक्रम स्वीकारायला नकार दिला आहे. आमीरच्या मैत्रीपुढे पैशांची काय किंमत असेच जणू सलमानने आपल्या या कृतीतून दाखवून दिले आहे.

Leave a Comment