नांदेड, दि. १२ – राष्ट्रवादीने आघाडी धर्म न पाळल्यामुळे आम्हाला धोका झाला. त्यामुळे दुसर्या टप्प्याच्या मनपा निवडणुकीत कॉंग्रेस स्वबळावर लढत आहे, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलतांना दिली.
नांदेड विमानतळावर पत्रकारांशी बोलतांना माणिकराव ठाकरे म्हणाले की, लोकसभा, विधानसभा तसेच विधान परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस हा पक्ष नंबर एकवर आहे. जिप निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडीचा धर्म न पाळल्यामुळे आम्हाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे दुसर्या टप्प्यात होत असलेल्या पाच महापालिका निवडणुकीत आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कॉंग्रेस स्वबळावर निवडणुका लढवित आहे. पाचही ठिकाणी कॉंग्रेसचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी ठाकरे यांचे स्वागत केले. यावेळी जिप अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, उपमहापौर शमीम अब्दुल्ला आदी उपस्थित होते.