तमाशा हा लोककला प्रकार म्हणजे महाराष्ट्राचा जीव की प्राण. वर्षानुवर्षं ही कला सादर करून लोकांचं मनोरंजन करणाऱ्या तमासगिरांचं खरं आयुष्य मात्र तितकंसं सुखावह नाही. त्यातही “नाच्या’चं काम करणाऱ्या कलावंतांच्या वाट्याला समाजाकडून कायम अवहेलनाच आली. अशाच एका “नाच्या’ची जीवनकहाणी उलगडून सांगणारा नवा मराठी चित्रपट म्हणजे “नटरंग’! डॉ. आनंद यादव यांच्या याच नावाच्या कादंबरीवरून रवींद्र हरिश्चंद्र जाधव यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अतिशय मेहनत घेऊन तयार केलेली ही कलाकृती उत्तम अभिनय, अप्रतिम संगीत आणि इतर सर्व लहान-मोठे घटक जुळून आल्यानं अतिशय प्रेक्षणीय व देखणी झाली आहे.