पैशावरचे भूत

काँग्रेस पक्षाची मुंबईवर खास मेहेरनजर आहे.या पक्षाने मुंबई शहर काँग्रेसवर वेगळी कृपा करून या शहर शाखेला मुंबई प्रदेश काँग्रेस असा दर्जा बहाल केला आहे.देशातल्या अन्य कोणत्याही शहरातल्या शाखेला असा दर्जा दिलेला नाही. काँग्रेसच्या नेत्यांसाठी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. देशभरात जमा होणार्‍या आयकरापैकी  ४५ टक्के आयकर एकट्या मुंबईत जमा होतो. पक्षाचा निधी गोळा करायला यापेक्षा चांगले ठिकाण कोणते असेल ? म्हणूनच अनेक नेते मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष होण्यासाठी जीव टाकत असतात. एकदा हे पद मिळाले की त्यांची अवस्था पाँचो उंगलिया घी मे, अशी  होते. पक्षश्रेष्ठींकडे अब्जावधींचा निधी पाठवता पाठवता त्यातला काही माल गपापा केला तरी काही वर्षात कोट्यधीश होता येते. म्हणून १९७० साली उत्तर प्रदेशातून मुंबईत येणारा कृपाशंकर सिग यांच्यासारखा माणूस १९७० साली ढकलगाडीवर कांदे विकत असतो पण एकदा मुंबई प्रदेश काँग्रेसचा अध्यक्ष झाला की, सर्वांना विकत घेता येईल एवढ्या बेनामी संपत्तीचा मालक होतो. असा माणूस सत्तेच्या वरच्या थरावर आपला जम बसवून राहू शकतो. भाजपात प्रमोद महाजन यांची किमत याच एका जोरावर वाढलेली होती हे विसरता येत नाही. कृपाशंकर यांचा सोनिया गांधी यांच्याशी थेट संफ आहे आणि  अहंमद पटेल यांच्याशी सरळ संवाद आहे.  अहंमद पटेल या माणसाचे काँग्रेसमधले आजचे स्थान मनमोहनसिग यांच्यापेक्षाही वरचे आहे. त्यामुळे अहंमद पटेल यांच्याशी जमवून घेतात ते कितीही पापे करून तरून जातात. विलासराव देशमुख यांचे केन्द्रातले स्थान  अढळ असण्यामागे हेच रहस्य आहे. २००३ साली महाराष्ट्राच्या  मुख्यमंत्रीपदात बदल झाला. विलासराव देशमुख यांना हटवून सुशीलकुमार शिदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले तेव्हा या बदलाची माहिती पहिल्यांदा सोनिया गांधी, अहंमद पटेल आणि कृपाशंकर यांनाच होती. कृपाशंकर यांनी सांगितल्यानंतरच शिदे यांना आपण मुख्यमंत्री होणार आहोत हे कळले.

विलासराव देशमुख यांनाही अहंमद पटेल यांचा आशिर्वाद होता पण तरीही त्यांना एकदा हे पद सोडावे लागले ते केवळ कृपा शंकर यांची अवकृपा झाली म्हणूनच. एवढा हा पॉवरफुल माणूस गेली दहा वर्षे किती अडपझडप पैसे खात होता आणि त्याने संपत्ती, जमिनी आणि सदनिका यावर किती आडवा हात मारला होता याचे दर्शन आता घडायला लागले आहे. या काळ्या कमाईची यादी मोठी आचंबित करणारी होती. महानगर पालिका निवडणुकीत शिवसेना  प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे यांच्या वादात मालमत्तेचा मुद्दा आला तेव्हा ठाकरे यांनी राणे यांना आव्हान दिले. राणे यांनी आपली मालमत्ता घ्यावी  आणि आपण त्याच्या बदल्यात राणे यांची जायदाद घ्यायला तयार आहोत असे ठाकरे म्हणाले. असा हा राणे- ठाकरे वाद जारी असताना कृपाशंकर यांनी मध्येच तोंड घालून ठाकरे यांना असेच आव्हान दिले. त्यातून त्यांना आपण गरीब आहोत असे भासवायचे होते. आता त्यांच्या मालमत्तेची अलीबाबाची गुहा उघडली गेली आहे आणि कृपाशंकर यांनी सार्वजनिक पैशांवर अक्षरशः दरोडा घातला आहे असे लक्षात यायला लागले आहे. त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करणारा अर्जर्र्र्र्र्र्र्र्र्र्र् मुंबईच्या संजय तिवारी या नागरिकाने माहितीच्या अधिकाराखाली केला तेव्हा हा सारा चोरीचा मामला उघड झाला. या बेकायदा मालमत्तेचे तपशील आता उघड झाले आहेत. आता उच्च न्यायालयाने कृपाशंकर यांची मालमत्ता जप्त करून त्यांच्यावर खटला भरावा असा आदेश दिला आहे. खरे तर २०११ च्या मार्चमध्ये उच्च न्यायालयाने असाच आदेश दिला होता. आयकर खाते आणि लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने कृपाशंकर यांच्या मालमत्तेची चौकशी करावी असे फर्मावले होते.

न्यायालयाचाच आदेश आहे म्हटल्यावर सरकारने अशी चौकशी सुरूही केली होती पण त्यांनी आपल्या वरिष्ठ स्तरावरच्या लाग्याबांध्यांचा वापर करून ही चौकशी थांबवली. आपल्यावर कसलीच कारवाई होत नाही आणि चौकशीही होऊ शकत नाही याची त्यांना एवढी घमेंड होती की त्यांनी उघडपणे पैसे खायला सुरूवात केली होती. पैसे खाणारा जपून पैसे खातो. चेकने पैसे घेत नाही पण कृपाशंकर त्यालाही घाबरत नव्हते. त्यांनी २ जी स्पेक्ट*म प्रकरणात सहभाग असलेल्या डीबी रियाल्टीज या कंपनीकडून उघडपणे चेकने पैसे घेतले होते. तेही थोडे थोडके नव्हे तर दोन कोटी रुपये. हे पैसे का घेतले हे काही त्यांना सांगता आले नाही. त्यांनी जे काही स्पष्टीकरण केले ते साध्या हवालदारालाही पटणारे नव्हते. असा त्यांचा या सर्वात मोठ्या भ्रष्टाचाराशी संबंध होता. झारखंडात एकदा सत्ता बदल झाला तेव्हा त्यांना पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवले होते. तिथे जाऊन त्यांनी मधू कोडा यांना मुख्यमंत्री करून दाखवले. एकमेव अपक्ष आमदार मुख्यमंत्री होतो ही कृपाशंकर यांच्या कृपेची किमया होती. पुढे या सरकारच्या एका मंत्र्याशी त्यांनी व्याही म्हणून नाते जोडले. या लग्नात त्यांना एका बांधकाम कंपनीने १५ लाखाचा आहेर केला. हा आहेर काही उगाच केला नाही. कृपाशंकराची कृपा व्हावी असाच त्यामागचा हेतू होता. असे हे अनेकावर कृपा करणारे शंकर आता न्यायालयाच्या अवकृपेचे धनी झाले आहेत. 

Leave a Comment