
सध्या निवडणुकीचे वारे वहात आहे.राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष एका आघाडीत आहेत पण राज्यातल्या नगरपालिका निवडणुकीत हेच दोन पक्ष एकमेकांच्या विरोधात असे शड्डु ठोकून उभे आहेत की ते परस्परांचे कट्टर शत्रू आहेत असे वाटावे.निवडणुका म्हटल्यावर दावे-प्रतिदावे, आव्हान- प्रतिआव्हान आणि आरोप-प्रत्यारोप यांना ऊत आला असून हेच दोन पक्ष परस्परांना ठोकत आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही ठिकाणी बोलताना, सरकार या नगर पालिकेला निधी देईल अशी घोषणा केली तर काही ठिकाणी निधी देण्याचे आश्वासन दिले. त्यावर वित्त मंत्र्यांचे पित्त खवळले. त्यांनी मुख्यमंत्र्यांना खडसावले. (ते कधी साधे सुधे बोलतच नाहीत.नेहमी खडसावत असतात.) स्वतः न केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नका, दुसर्यांनी केलेली कामे आपली म्हणून सांगू नका. अर्थ मंत्री मी आहे. निधी देण्याचे काम माझे आहे. तिजोरीच्या चाव्या माझ्या हातात आहेत. तेव्हा कोणालाही दिलेला निधी मी दिलेला असतो. अर्थ मंत्री अजित पवार यांचा हा दावा कितपत खरा आहे ? अर्थमंत्री हा तिजोरीच्या चाव्या बाळगतो हे खरे आहे पण ज्याच्या हाती चाव्या असतात तो मालक असतो का ?
