
महाराष्ट्राच्या विविध भागांत उसाच्या दरासाठी आंदोलन सुरू आहे.साखर पट्ट्यात ते तीव्र होत आहे.तिथे त्याने हिंसक रूप धारण केले असून त्यामुळे काही कारखान्यांनी आपले सुरू झालेले गळीत हंगाम बंद केले आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या काही कारखान्यांवर ऊस उत्पादकांनी हल्ले करून नुकसान केले आहे. या उपरही ऊस वाहतूक होत असल्यास वाहनांच्या चाकातली हवा सोडली जात आहे. २३०० रुपये प्रतिटन पहिली उचल दिल्याशिवाय उसाला हात लावू देणार नाही अशी घोषणा करून शेतकरी संघटना मैदानात उतरली आहे. या आंदोलनाला शेतकर्यांचा पाठींबा मिळत आहे कारण त्यांच्या याबाबतच्या भावना तीव्र आहेत. साहजिकच आहे. जगातल्या प्रत्येक वस्तूच्या किमती वाढत आहेत, ग्रामीण भागात विशेषतः साखर कारखाने खूप असलेल्या भागात कामाला मजूर मिळणे कठीण झाले आहे, माणसाची दिवसाची मजुरी २०० रुपयांच्या पुढे गेली आहे. मजुरी वाढत असतानाच त्यांचे कामाचे तास कमी होत आहेत. पूर्वी मजूर काम मागताना मालकांच्या हातापाया पडत होते पण आता मालकच मजुरांचे पाय धरत आहेत. खताचे दर वाढत आहेत. असा उसाचा उत्पादन खर्च वाढला असताना शेतकर्यांना गेल्या वर्षीच्याच दराने ऊस घाला असे कोणत्या तोंडाने म्हणायचे असा प्रश्न साखर कारखान दारांना पडला आहे. शेतकरीही त्यास राजी नाही.
