
पुणे दि.२६- महाराष्ट्र सरकारने नुकत्याच जारी केलेल्या अध्यादेशामुळे बैलगाडी शर्यतीचा आनंद यापुढे ग्रामीण महाराष्ट्रातील जनतेला लूटणे शक्य होणार नसल्याचे समजते.शासनाने अशा प्रकारच्या शर्यतींवर राज्यात बंदी आणली असून ती ताबडतोब लागू करण्यात आली आहे.याविषयी मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने २४ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या अध्यादेशात असे म्हटले आहे की केंद्रशासनाने ११ जुलै रोजी जो अध्यादेश जारी केला आहे, त्यानुसार अस्वल, माकड, वाघ, चित्ते, सिह यांच्या प्रदर्शनावर बंदी आली आहे. त्याच तत्वावर महाराष्ट्र शासनाने बैलांच्या शर्यती, त्यांचे प्रदर्शन तसेच खेळांवर बंदी आणली आहे.
सरकारच्या या अध्यादेशाने राज्यातील बैलमालक नाराज झाले असून पश्चिम महाराष्ट बैलगाडा शर्यत संघटनेने शासनाच्या या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात बंदीची कारणे द्यावीत यासाठी याचिका दाखल केली आहे. तसेच त्यासंबंधीची नोटीस पर्यावरण व वन मंत्रालयालाही देण्यात आली आहे. अॅड.धैर्यशील सुतार यांनी ही याचिका संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. ते म्हणाले की प्रिव्हेन्शन ऑफ क्रूएल्टी टू अॅनिमल अॅक्ट १९६० नुसार शर्यतीसाठी प्राण्यांचा छळ करणे गुन्हा असून शर्यतीत कोणत्याही बैलाचा कधीच छळ केला जात नाही तर मालक त्यांची अतिशय काळजीच घेत असतात. बैलगाडा शर्यती ही महाराष्ट्रची वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा असून ग्रामीण जनतेसाठी हा आनंदाचा भाग आहे. त्यामुळे त्यावर बंदी आणणे हे गैर आहे.
प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू अॅनिमल संघटनेचे अध्यक्ष अनिल कटारिया याबाबत म्हणाले की गेली कित्येक वर्षे मी या शर्यतींवर बंदी यावी म्हणून प्रयत्न करत आहे. केवळ बैलच नव्हे तर घोडागाडीसाठी वापरल्या जाणार्या घोड्यांनाही मालक अतिशय क्रूर वागणूक देतात. सुरवातीला मी अशा बैलगाडा मालक, घोडागाडी मालकांना भेटून त्यांना तशी विनंती करत असे. पण त्याचा कांहीच उपयोग होत नाही म्हटल्यवर २००४ साली मी या विरूद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठापुढे याचिका दाखल केली. त्यावर २००७ साली खंडपीठाने अंतरिम निर्णय देऊन अहमदनगर जिल्ह्यात घोडा व बैल यांच्या संयुक्त शर्यतीवर बंदी आणली आहे मात्र त्याचाही अंतिम निर्णय अद्याप लागलेला नाही. या शर्यतींना केवळ शर्यतीचे स्वरूप राहिलेले नसून तो एक प्रकारचा जुगारच बनला आहे. गर्दीच्या आनंदासाठी या मुक्या जनावरांना कित्येक मैल धावावे लागते. जिकणे अथवा हरणे याची जाणीव या मुक्या प्राण्यांना नसतेच. जिकणे हा गाडा मालकाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न असतो व त्यामुळेच या जनावरांना मारहाण केली जाते, टोकदार वस्तूंनी टोचले जाते तर कधीकधी दारूही पाजली जाते. हे बंद होणे आवश्यक आहे.