
पुणे,दि.१-महात्मा गांधींनी ज्या प्रमाणे वर्धा जिल्ह्यात सेवाग्रामला आपल्या आंदोलनाचे मुख्यालय ठेवले होते त्याप्रमाणेच बहुदा अण्णा हजारे राळेगणला भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनाचे मुख्यालय ठेवतील. राळेगणला हे मुख्यालय असावे या दृष्टीने त्याची रचना बांधणी केलेली नाही पण गेल्या तीस वर्षात या गावाला आदर्श गाव म्हणून पाहण्यासाठी तीन लाखाहून अधिक पाहुणे येअून गेले आहेत. गेली दहा वर्षे दररोज अन्य राज्यातून येणार्यांची संख्या किमान शंभर असते. अन्य राज्यांतून आलेल्यांशी विकासाच्या कामाबाबत कसे बोलायचे त्यांना तो विषय कसा समजून सांगायचा हे आता तेथील ग्रामस्थांच्या चांगले अंगवळणी पडले आहे. राज्यात पन्नास गावात आदर्श गाव योजना सुरु आहे तेथे व अन्य राज्यात असेच काम सुरु असलेल्या तीनशे गावात राळेगणच्या अनुभवाच्या आधारे विषय मांडून येणारांची संख्याही मोठी आहे. तोडक्यामोडक्या इंग्रजीतही आपापले विषय मांडण्याची कार्यकर्त्यांची तयारी असते. राळेगणला यादवबाबा वसतीगृह असल्याने बाहेरून आलेल्या पाचशेपेक्षा अधिक पाहुण्यांची व्यवस्था करण्याची क्षमता तेथील व्यवस्थेत आहे व कोणत्याही घरी पाहुणा जाअून राहिला तर त्याच्या स्वागताचीही तयारी असते. आदर्श गावकामासाठी अण्णांनी राळेगण हेच मुख्यालय केले होते जनलोकपालविधेयकाच्या चळवळीसाठी आपला विषय कसा मांडायचा याची तेथील कार्यकर्त्यांना सवय आहे. येथे अनेक मुख्यमंत्री, अनेक मंत्री व केंद्रीय मंत्री,अने क राज्यातील मोठे पदाधिकारी,विदेशातील राजदूत यांच्याशी बोलू शकणार्या कार्यकर्त्यांची संख्याही कमी नाही.
सध्या अण्णा देशातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.शुद्ध चारित्र्याचा आग्रह, रचनात्मक कामातून राज्यात राळेगणसारखी पन्नास गावे तयार करण्याचा अनुभव आणि भ्रष्टाचारविरोधातील आंदोलनासाठी हवी ती किमत मोजण्याची तयारी हे तरुणांचे आकर्षण आहे. त्यामुळे तरुण पिढीला अण्णा पुढील पन्नास वर्षांच्या प्रत्यक्ष राष्ट्रबांधणीसाठी अण्णा कोणता कार्यक्रम देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
अण्णांनी आज दिवसभर विश्रांतीच घेतली तर अजून त्यांचा अशक्तपणा कमी झालेला नाही. शुक्रवारी ते एका समारंभात बोलतील पण लगेच विश्रांतीला रवाना होतील.पुढील आठवड्यात दि. १० आणि ११ सप्टेंबररोजी अण्णा टीमची कोअर कमेटीची बैठक आहे. त्यात जनलोकपालविधेयकाच्या पाठपुराव्यासाठी काय करायचे याला जसे महत्व आहे तेवढेच देशातील तरुणांना काय कार्यक्रम द्यायचा याची दिशा ठरणार आहे.वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम नंतर एकविसाव्या शतकातील सेवाग्राम महाराष्ट्रातच उभे रहातआहे, हे विशेष.