_0.jpg)
पुणे – अण्णांच्या उपोषणाचा दहावा दिवस उजाडला असूनही अजून कोणताच तोडगा दृष्टीक्षेपात येत नसल्याने अण्णांच्या गावचे म्हणजे राळेगण सिद्धीचे गावकरी आता चितेत पडले असून अण्णांच्या तब्येतीच्या काळजीने त्यांचे चित्त थार्यावर नसल्याचा अनुभव येत आहे. बुधवारपासून या गावकर्यांनी त्यांचे आंदोलनही अधिक तीव्र केले असून अनेक नागरिक गावातच बेमुदत उपोषणाला बसले आहेत. सरकारच्या वेळकाढू धोरणाच्या विरोधात गावात निदर्शनेही करण्यात येत आहेत.
राळेगण सिद्धीत दररोज सायंकाळी ग्रामसभा बोलावली जात असून त्यात चर्चा आणि आंदोलनाची पुढील कृती ठरविली जात आहे. त्याचबरोबर तोडगा निघू दे आणि अण्णांचे उपोषण संपूदे अशी प्रार्थनाही केली जात आहे. सरपंच जयसिंग मपारी आणि उपसरपंच संपत ओगळे यांनीही उपोषण सुरू केले असून गावात गेले सहा दिवस चक्री उपोषण सुरूच आहे. आसपासच्या गावातील गावकरीही मोठ्या प्रमाणात या चक्री उपोषणात सामील होण्यासाठी नांवे नोंदवत असल्याचे अण्णांचे सहकारी सुभाष पठाडे यांनी सांगितले. अण्णांचे जेथे वास्तव्य असते त्या यादवबाबा मंदिरातच हे चक्री उपोषण सुरू आहे.