१६ ऑगस्टपासून पुन्हा एकदा अण्णा आमरण उपोषणाला बसणार

पुणे – संसदेत सादर केलेल्या लोकपाल बिलाची अण्णा हजारे समर्थकांनी आज होळी केली असून येत्या १६ ऑगस्टपासून या विधेयक मसुद्याच्या विरोधात पुन्हा एकदा अण्णा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मात्र यावेळी अण्णांच्या प्रकृतीच्या काळजीने त्यांचे राळेगणसिद्धीतील गावकरी व्याकुळ झाले असल्याचे जाणवते आहे. ७३ वर्षीय अण्णांचे हे १२वे उपोषण आहे.
   राळेगणसिद्धीचे दत्ता अवारी सांगतात, अण्णांची प्रकृती गेले कांही दिवस ठीक नाही. ते पुन्हा उपोषणाला बसणार आहेत पण त्यामुळे त्यांना अधिकच त्रास होईल अशी आम्हाला भीती वाटते आहे. अर्थात अण्णांचा उपोषणाचा निर्धार पक्का असल्याने आम्हीही त्यांच्या सोबत उपोषणात सामील होणार आहोत. कांही गावकरी अण्णांसोबत दिल्लीत जातील तर बाकीचे गावात राहूनच उपोषणात सहभागी होणार आहेत.
  दिल्ली पोलिसांनी जंतरमंतरवर उपोषणास बसण्याची परवानगी नाकारली असल्याने उपोषणाची जागा निश्चत नाही असे सांगून तरूण गांवकरी एकनाथ भालेकर म्हणतात की गेली अनेक वर्षे अण्णा भ्रष्टाचाराविरोधात लढत आहेत आणि भ्रष्ट मंत्र्याविरूद्द तसेच भ्रष्ट प्रशासकीय अधिकार्‍यांविरोधातही त्यांनी यापूर्वी अनेक वेळा उपोषणाचे हत्यार उगारले आहे. अण्णांचे हे उपोषण मोडून काढण्याच्या धमक्या आम्हाला मिळाल्या आहेत मात्र जनतेचा पाठिंबा हीच अण्णांची शत्त*ी असून त्याच्या बळावरच हे आंदोलन लढले जात आहे.या आंदोलनादरम्यान कोणतीही अनिष्ट परिस्थिती उद्भवली तरी आम्ही माघार घेणार नाही.हे आंदोलन यशस्वी व्हावे आणि अण्णांची प्रकृतीही चांगली राहावी यासाठी गांवकरी देवाची प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी सांगितले. एकदा का अण्णा दिल्लीहून परतले की पुढे काय कृती करायची याविषयी मार्गदर्शन करणार असल्याचेही भालेकर यावेळी म्हणाले.