मुंबई : महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई ८ मार्च – महिला आपल्या कर्तृत्वाने आकाशाला गवसणी घालतच आहेत. त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवावा, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त करुन राज्यातील महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री आपल्या संदेशात पुढे म्हणतात की, स्त्री शिक्षणाची सुविधा राज्यात सुमारे दीडशे वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरु केली. तोच धागा पकडून राजर्षी शाहू महाराज यांनी त्याला प्रोत्साहन दिले.

महाराष्ट्राला समाजसुधारणेचा फार मोठा वारसा लाभलेला आहे. महिलांच्या उन्नतीसाठी समाजसुधारकांनी केलेल्या संघर्षामुळेच महिला विकासामध्ये महाराष्ट्र अग्रेसर राहिलेला आहे. देश व आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्त्री चळवळीचा सकारात्मक परिणाम होऊन महाराष्ट्र शासनाने देशात पहिले महिला धोरण जाहीर केले. देशामध्ये महिला धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले. या धोरणामध्ये महिलांचे मुलभूत प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात आला आहे. राज्य शासनाने महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना जाहीर केल्या. महिला बचत गटांना चार टक्के व्याजदराने कर्जपुरवठा तसेच ९० टक्क्यांपेक्षा जास्त अंगणवाडी केंद्रांना पूरक पोषण आहाराचा पुरवठा, स्वयंसहाय्यता महिला बचत गटांमार्फत व महिला मंडळांमार्फत करण्याचे तसेच कौटुंबिक हिसाचारापासून महिलांचे संरक्षण असे महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहेत. राज्यातील सर्व महिलांना, त्यांच्या क्षमता विकसीत होण्यासाठी आणि कर्तबगारीला संधी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.