‘स्वरभास्कर’….. उरल्या फक्त आठवणी

संगीताचा ध्यास, त्यासाठी केलेले अविरत कष्ट, अखंड परिश्रम, एकनिष्ठ गुरुसेवा, पंच्याहत्तर वर्ष गुरूंची स्वरसाधना केलेले अद्वितीय कलासाधक अर्थात पंडित भीमसेन जोशी. त्यांनी आपल्या तेजस्वी दमदार आणि आक्रमक सुरांनी कोटीकोटी रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य केले आहे. त्यांना मिळालेला भारतरत्न पुरस्कार म्हणजे त्यांच्या संगीत साधनेला केलेला मानाचा मुजराच. पुरस्काराची बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. जो तो आपल्या परीने आनंद व्यक्त करत होता. धन्यता अनुभवतो. पंडितजींचे भक्त आणि संगीताचे अभ्यासक विजय कोपरकर तसेच पंडितजींच्या सहवासातले त्यांचे साथीदार टाळ वादक माऊली टाकळकर, तबला वादक चंद्रकांत कामत यांनी अनुभवलेले क्षण, प्रसंग पंडितजींच्या भूतकाळात घेऊन जातात.  

कार्यक्रमातल्या आणि पंडितजींच्या सहवासातल्या आठवणी सांगताना माऊली टाकळकर म्हणतात, “१९७६’ पंडितजींची आणि माझी ओळख झाली. ठाण्याला होणाऱ्या कार्यक्रमात त्यांचे टाळकरी येणार नव्हते. तेव्हा माझे मित्र विठ्ठल कदमांनी मला विचारले मला एकदम दडपण आले. एवढ्या मोठ्या माणसाला साथ करायची मी भीतीने नाही म्हटले. पण अडचण लक्षात घेऊन शेवटी हो म्हटल. यावेळी केलेल्या साथीवर पंडितजी एवढे खुश झाले. त्यांनी सांगितले यांना आपल्या कार्यक्रमात नेहमीसाठी घ्या. तेव्हापासुन आजपर्यंत आमचे सूर जुळलेले राहिले. हे पूर्व जन्मीचे संचीतच होय.” 

पंडितजी एकदा का कार्यक्रमात गायला बसले की त्यांचा पहिला सा लागताना उपस्थित श्रोत्यांची खात्रीच पटायची की आजचा कार्यक्रम एकदम जमून जाणार. मी ३३ वर्षे त्यांच्याबरोबर साथ केली आहे. ३००० संतवाणीचे कार्यक्रम केले आहेत. १९९० जेव्हा संतवाणी बंद केला तेव्हा मी काळजीने त्यांना विचारलं, “आता माझे पुढे काय?” ते म्हणाले, “माझ काय म्हणजे तू आता माझ्या बरोबर कायमच राहणार. मी क्लासिकलमधे प्रत्येकवेळी एक अभंग म्हणणारच. तेव्हा तुला एका अभंगासाठी का होईना घेऊन जाणार. मी त्यांच्याबरोबर संपूर्ण महाराष्ट्र एवढंच काय भारतभर तसच अमेरिका, इंडोनेशिया, जकार्ता, सिंगापूर, दुबई, अबुधाबी, मस्कत, बहारीन, शारजा इथेही गेलो. भारताबाहेर पंडितजींबद्दल फार आदर आहे. संतवाणीची अफाट लोकप्रियता हे त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आहे. तेवढी त्या गाण्याची तपश्चर्या आहे. तीर्थ विठ्ठल… हा अभंग गाताना ते जेव्हा विठ्ठल विठ्ठल…… ठ्ठ्लss…. ठ्ठ्ल…..s…..s म्हणायचे तेव्हा आमच्या अंगावरचे केस ताठ उभे रहायचे. एवढी त्यांच्या गाण्याशी एकरूपता होती. शब्दोच्चार व त्याच्याशी एकरूप होण्याची सवय, त्यातल्या भावाचे सादरीकरण म्हणजे स्वर ब्रम्हानंदीच लागायचा. त्यामुळे आम्ही सुद्धा तल्लीन व्हायचो.

गाण्यातल्या शब्दांचे उच्चार जसेच्या तसे अभंगात यायला हवेत. याकडे वत्सलाबाईंचाही फार कटाक्ष असायचा. एखादा शब्द मागेपुढे झाला की त्यांच्या लगेच लक्षात यायचं. गाण्याच्या रेकॉर्डींगला त्या जातीने हजर असत. खटलेल्या गोष्टीत रेकॉर्डींग थांबवुन त्यावर चर्चा करून लगेच दुरुस्ती करवुन घेत.           

पंडितजी बालगंधर्वांना गुरूप्रमाणेच मानत. त्यांच्या संपूर्ण संतवाणीमध्ये बालगंधर्व, मा. कृष्णराव आणि सवाई गंधर्व यांचा मिलाफ असे. कानोबा तुझी घोंगडी… म्हणताना पंडितजी मा. कृष्णरावच जणू उभे करायचे. तीर्थ विठ्ठल, इंद्रायणी काठी, नामाचा गजर, अणुरणीया थोकडा हे सर्वच अभंग लोकप्रिय. कितीही वेळा ऐकले असले तरी लोक त्यांचीच फर्माईश करायचे. कारण या सगळ्या गाण्यात पंडितजींनी जीव ओतला. जस लोकांच त्यांच्या गाण्यावर प्रेम तस पंडितजींच लोकांवर प्रेम. गेल्या सवाई गंधर्व महोत्सवात पंडितजी गायले. ते म्हणाले गेली दोन वर्षे मी गायलो नाही. लोक नाराज होतात. यावेळी मी १५ मिनिटे गाईन. आणि दोन वर्षात गाण्याला स्पर्शही नव्हता. आजारी होते. तरीही ठरवुन गायले. सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अहो परमेश्वरी कृपेशिवाय हे होऊच शकत नाही. त्यांची ७५ वर्षांची सुरांची तपश्चर्या ही काही साधीसुधी नव्हती. 

एकदा पैठणला महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेला नाथषष्ठीचा कार्यक्रम होता. संध्याकाळच्या कीर्तनानंतर रात्री १० ला संतवाणीचा कार्यक्रम होता. पैठणला जात असताना वाटेत आमची आणि पंडितजींच्या गाडीची चुकामुक झाली. आम्ही वेळेत पोहोचु शकलो नाही. तिथे जमलेले लोक मात्र आमची वाट पाहून तिथेच झोपी गेले होते. प्रचंड गर्दी. ८० हजारावर लोक होते. आम्ही पोहोचल्यावर, पंडितजी आल्याचे कळताच सर्व रसिक झोपेतून उठून कार्यक्रमाला हजर. आणि रात्री २ वाजता कार्यक्रम सुरु झाला.

कन्नडमध्ये त्यांची जवळजवळ १५० भजने आहेत. मराठीत १२५ भजने त्यांनी गायिली आहेत. सगळीच्या सगळी लोकप्रिय झाली. ते कलाकार आम्हा साथीदारांनाही खुश ठेवायचे. मान द्यायचे. आपलेपणाने वागवायचे. दुजाभाव कधीही केला नाही. फारफार मोठ्या मनाचे. त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिले.

चंद्रकांत कामत १९५६ ते १९६७ पर्यंतचा काळ पंडितजींच्या बरोबर तबल्याची साथ करायला होते. त्यांच्या अनेक गाजलेल्या कार्यक्रमाच्या व प्रवासातल्या आठवणी सांगताना ते म्हणतात, आकाशवाणी पुणे केंद्रावर तबलावादक म्हणून रुजू झालो आणि त्याच सुमारास आकाशवाणीच्या संगीत सभेत भीमसेनजी गाणार होते. त्यावेळी या सभांचे आकाशवाणीवरून थेट प्रसारण होत असे. त्यात थिरकवां साहेबांचे तबलावादन सुरुवातीला आणि नंतर पंडितजींचे गाणे. पंडितजींनी मला धीर दिला की तू तुझ्या पद्धतीने वाजव ताण घेऊ नकोस. मी तर नॉर्मलच होतो. भीमसेनजींनी अभोगी राग गायला. ‘चरण घर आये….’ ही झपतालातील बंदीश होती. कार्यक्रमानंतर ते आतमध्ये आले आणि मला मिठीच मारली. म्हणाले फारच सुंदर ठेका दिलात. आता तुम्हाला माझ्या बरोबर गाण्याला घेऊन जाणार. मी बोलवीन तेव्हा माझ्या बरोबर यायचं. आणि लगेच १५ दिवसात फलटणच्या कार्यक्रमाचा निरोप आला. त्यांच्या गाण्याच्या बैठकीचा साचा ठरलेला असायचा. त्यात बदल नाही. पहिला एक राग, नंतर ठुमरी, त्यानंतर इंद्रायणी काठी, मग मध्यंतर! त्यानंतर मालकंस, मग नाट्यसंगीत आणि शेवटी भैरवी. असं पाच ते सहा तास गाणं व्हायचं. ते ही एका दमात. पंडितजी एक राग दोन तास गायचे. ते नावाप्रमाणेच ‘भीम’ होते.

संतवाणीच्या जन्माची कहाणी सांगताना चंद्रकांत कामत म्हणाले, “बेडेकर गणपतीवाले गोविंद बेडेकर आणि रमेश देशमुख पंडितजींना म्हणाले की नुसत्या अभंगांचा एक कार्यक्रम करू.”त्यानुसार नुकतचं पुणे आकाशवाणी केंद्रावर अणुरणीया, तीर्थ विठ्ठल, अधिक देखणेपण, पंढरीनिवासा हे अभंग रेकॉर्ड झाले होते. आषाढी एकादशीनिमित्त कार्यक्रम करायचा ठरला. पेपरला जाहिरात दिली पण कार्यक्रमाची रूपरेषाच ठरली नव्हती. आषाढी एकादशी, वारकरी संप्रदाय या पार्श्वभूमीवर सुरुवात जयजय रामकृष्ण हरीनेच व्हायला पाहिजेना. शिवाय संतवाणी मध्ये अभंगच हवेत. दुसरी गाणी चालणार नाहीत. मग तशी रचना ठरली. ‘रूप पाहता लोचनी’ हे सुरु झाल्याशिवाय अभंग सुरूच करत नाही. असा रिवाजच आहे मुळात. पण पंडितजी म्हणाले या पद्धतीने एकदाच गाईन. पुन्हा गाणार नाही. मी म्हटलं अहो तुम्हाला आवडत नसलं तरी लोकांना तेच आवडतयं. त्यामुळे तुम्हाला तसच गावं लागेल. त्यांना वाटलं हे आपल्याला नेहेमी जमणार नाही. या कार्यक्रमाची तिकीट विक्री केव्हाच संपली. पहिलाच हाउसफुल कार्यक्रम पुणे विद्यार्थिगृहात झाला. इतकी अलोट गर्दी झाली की पोलीस बंदोबस्त बोलवायला लागला. नंतर लगेच कार्तिकी एकादशीला कार्यक्रम झाला. मग मागणी वाढतच गेली. कुणी संस्थेकरिता, कुणी मदतीकरिता, कुणी एखाद्या निमित्ताने कार्यक्रम ठेवु लागले. प्रत्येक ठिकाणी अलोट गर्दी. पैठणच्या कार्यक्रमात तर एवढी प्रचंड गर्दी. आमचा कार्यक्रम सुरु झाला. पंडितजींनी ख्याल सुरु केला. प्रेक्षकात समोरच प्रचंड कोलाहल सुरु होता. एक आवर्तन होत नाही तोवर लोक उठून जाऊ लागले. पंडितजी मला म्हणाले अरे काय करायचं. तू काय वाजवतोस हे मला काहीही ऐकायला येत नाही. मी म्हटलं तुम्ही काय गाताय हे मलाही ऐकू येत नाही. इतका कोलाहल होता. त्यांनी द्रुत चीज सुरु केली. आणि समोरच्या महिला एकदम उठल्या त्यांना वाटलं गाण संपल. त्यांनी ऐकलेलच नव्हत कधी. ते पाहून पंडितजींनी एवढा मोठा षड्ज लावला आणि अवघाची संसार अभंग सुरु केला क्षणातच सर्व लोक खाली बसले. शांतता पसरली. सहा अभंग, मध्यंतर, नंतर सात अभंग असा संतवाणीचा कार्यक्रम झाला.         

कर्नाटकातल्या कोप्पळ गावाला कार्यक्रम ठरला होता. गाव यायच्या दहा मैल अलीकडेच एका जंगलात गाडी नादुरुस्त झाली. काय बिघडलय ते समजेना. पंडितजी स्वतःच चालवित होते. शेवटी कोप्पळला वाट पहात असतील म्हणून निरोप देण्यासाठी माधव गुडेला चालत जायला सांगितले. रात्रभर आम्ही विश्रांती घेतली. सकाळी उठून पंडितजींनी पुन्हा प्रयत्न केला. तर गाडी सुरु झाली. आम्ही तासाभरात साडेसातला कोप्पळला पोहोचलो. समोरच दृश्य पाहून लोकांच्या प्रेमाची कल्पना आली. गाणं ऐकायला पंचक्रोशीतली पाच ते सहा हजारावर माणसे रात्रीपासुन वाट पहात थांबली होती. पंडितजींनी लोकांची माफी मागितली आणि संतवाणीचा कार्यक्रम झाला. इतकी कर्नाटकात सुद्धा त्यांची लोकप्रियता होती. आज भारतरत्न पुरस्काराचा जेवढा आनंद आपल्याला झाला हाच एवढाच आनंद पंडितजींच गाणं ऐकताना कर्नाटकातल्या लोकांच्या चेहऱ्यावर मी पाहिलं आहे. प्रेमापोटी हे लोक एक काय दोन-दोन दिवस वाट पहात थांबले आहे. 

भीमसेनजींच्या दातृत्वाची एक आठवण सांगताना म्हणाले केवढं दिलदार व्यक्तिमत्व आहे. १९७३-७४ ची गोष्ट आहे. नागपूरला साईबाबांचे मंदीर बांधण्यासाठी निधी संकलन म्हणून संतवाणीचा कार्यक्रम होणार होता. त्याला अभिनेते दिलीप कुमार हजर होते. तेव्हा दोन ते तीन लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. पहिल्या रांगेतल्या लोकांनी १० हजार रुपये दिले होते. राखीव खुर्चीचा दर जाहिर करण्याची पद्धत तेव्हा नव्हती. त्याचप्रमाणे दिलीप कुमार यांची सही असलेल्या फोटोचा लिलाव केला जात होता. हे सर्व संस्थेच्या मदतीसाठीच होते. शेवटची फोटोची बोली ५०० रु. झाली. त्यापुढे किंमत जातच नव्हती. शेवटी भीमसेनजींनी तो फोटो ६०६ रुपयांना विकत घेतला. हा फोटो आजही त्यांच्या घरात लावला आहे.     

पंडित विजय कोपरकर आठवण सांगताना म्हणतात, पंडितजींचे कार्यक्रमातील गायलेले तास मोजले तर त्यांच्या इतक रेकॉर्ड कुणी केले असेल असं मला वाटत नाही. अगदी दुर्गम भागापासुन लांब लांबवर प्रवास करून जाऊन ५-५/६-६ तासांच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. त्यांचा पहिला कार्यक्रम १९५६ ला झाला, असे म्हणतात. तेव्हापासुन आजपर्यंत ५२ वर्षे ते संगीताची दीर्घ साधना करीत आहेत. कुठेही गेले तरी त्यांच गाण तितकच लोकप्रिय होत. हे वैशिष्ट्य.

किराणा घराण्याचे संस्कार व ते गाण त्यांच्यामध्ये आहेच. पण ते नेहेमी सांगायचे की, मी अमीरखा साहेब, केसरबाई केरकर, अंजनीबाई यांच्या गाण्याचा अभ्यास खूप बारकाईने केला आहे. अमीरखा आणि बालगंधर्वांच्या गाण्यांचे ते निःस्सीम चाहते आहेत. त्यांनी केलेल्या ‘नाट्यरंग’ या कार्यक्रमातून ते प्रेम दिसतंच, त्यांच्या गायकीत घराण्यांचा संस्काराबरोबरच जो वेगवेगळ्या गोष्टींचा अविष्कार दिसतो तो त्यांच्या प्रतिभेचा भाग आहे. दुसरे म्हणजे किराणा घराण्याची सूरप्रधान व संथगायकी ही त्यांच्यात होतीच. पण त्याचबरोबर ग्वाल्हेर घराण्याची लयकारी ज्याला सुप्त लयकारी म्हणतात ती ही होतीच.     

त्यामुळे भीमसेनजींच्या गाण्याला लोक खिळून जायचे. कारण त्यांचे कुठलेही शब्द म्हणा, बोल त्या लयीच्या आवर्तनाशी अतिशय बांधुन यायचे. त्यांची तपश्चर्या म्हणजे, त्यांनी ७-७, ८-८ तास रियाज केला आहे. गुरु सवाई गंधर्वाच्या घरी कष्ट केले आहे, त्यांची सेवा केली आहे. तेव्हा हे संगीताचं वैभव त्यांना मिळालं आहे. ही कष्टसाध्य विद्या मिळविली, पुढेही रियाज करून, साधना करून जी सिद्धी त्यांना मिळाली म्हणूनच त्यांचे गाणं सामान्य माणसालाही भावलयं. जसे ‘पिया मिलन की आंस…..’, ही ठुमरी असेल ‘जो भजे हरी को सदा…..’, हे भजन किंवा कोमल रिषभ आसावरीमधली ‘मै तो तुमरो दास…..’ ही बंदीश. असं कुठलही गाणं भावपूर्णच आहे. मग ते क्लासिकलमध्ये असो, वा ठुमरीमध्ये. ते रसप्रधानच आहे. आणि हा त्यांचा स्वतःचा विचार आहे. या भावपूर्ण गायकीमध्ये त्यांच्या ‘संतवाणी’चाही मोठा वाटा आहे. भीमसेनजींनी आपली किराणा घराण्याची गायकी सुयोग्य वैशिष्ट्यांनी अलंकृत करून मांडल्याने व रागदारीवर आधारलेली अभंगवाणी लोकप्रिय केल्याने जनमानसात आवडत्या गायकाचे खास स्थान निर्माण केले आहे. संतवाणीमुळे त्यांचं गाणं अगदी सामान्य गावातल्या लोकांपर्यंत, वारकरी संप्रदायापर्यंत आणि संत परंपरेपर्यंत ते लोकप्रिय झाले. ‘संतवाणी’ म्हणजे काय होतं? उदा “जय जय राम कृष्ण हरी…” हे काय त्यांच्या दृष्टीने यमनच होता. ‘केतकी की गुलाब…’, ‘धन्य ही स्वर्गाहून लंका…’ ही सिनेमातली गाणी ऐकताना सुरांचा बाज आणि भारदस्तपणा आपल्याला जाणवतो.          

संस्कार भारतीनेच एकदा संगीत मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. पंडित अभिषेकीबुवांनी त्याचे नियोजन केले होते. मोठे मोठे कलाकार यामध्ये होते. पंडितजींनाही आमंत्रित केले होते. विद्यार्थ्यांना, ‘रियाज कसा करावा’ याविषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. तेव्हा रियाजाबद्दल बोलताना म्हणाले, “रियाज आणि महफिल यात असा फरक आहे की जे आपल्याला येत ते गाण म्हणजेच ती महफिल असते आणि जे आपल्याला येत नाही ते करणं म्हणजे रियाज असतो”.     

दूरदर्शनवरच्या प्रतिभा आणि प्रतिमा या कार्यक्रमात त्यांना सुहासिनी मुळगावकरांनी प्रश्न विचारला की, खुप मोठमोठे कलाकार परदेशात जाऊन येतात तुम्हीही जाऊन आलात तुम्हाला काय वाटत? त्यावर पंडितजी म्हणाले कावळे आणि पक्षीही परदेशात जातात. त्यात काय विशेष आहे. तसच राजकारणात जावस वाटल नाही का? या प्रश्नावर ते मार्मिकपणे म्हणाले, “आमचं वरून सिलेक्शन झालेलं आहे. त्यांनीच आम्हाला निवडुन खाली पाठविले आहे.” राजकारणी पुढाऱ्यांमध्येही पंडितजींचे असंख्य चाहते आहेत. अफाट लोकप्रियता असतानाही त्यांनी त्यांचा कधीच गैरफायदा घेतला नाही. पंतप्रधान झाल्यावर “मी गाडीत आपल्याच कैसेट एकतो” असे राजीव गांधींनी सांगितले. त्यांनी राज्यसभेचे मानद सभासद होण्याचे निमंत्रण दिले. पण पंडितजींनी स्पष्ट नकार दिला. ही पद मिळविण्यासाठी काही जण रितसर धडपड करीत असतात. पण पंडितजींनी ते नम्रपणे नाकारले. याबाबत राजीव गांधींनी स्वतः फोन करून विचारले असता पंडितजींकडून त्यांना शांतपणे उत्तर मिळाले की, “मेरे दो तनपुरे ही मेरे लिये राज्यसभा और लोकसभा है” असे इतके नम्र.

साथीदारांनाही ते खुप प्रोत्साहन देत. त्यांच्या कोठल्याही अटी नसायच्या. त्यांना ते खुप वाजवायला देत. कधीही त्यांनी साथीदारांचा अपमान केला नाही. अपशब्द नाहीत. रागावणं नाही. दूरदर्शनने तयार केलेले देस रागातील ‘मिले सूर मेरा तुम्हारा’ या अभिनव प्रयोगानंतर भीमसेनजी घराघरात पोहचले. या क्षेत्रातले ते आयडॉल झाले. आज ते आपल्यात नाहीत. मात्र, त्यांच्या आठवणी आणि त्यांचा आवाज कायम आपल्यासोबत असणार आहे. हीच त्यांना आठवणीची श्रद्धांजली.

डॉ. सौ नयना कासखेडीकर, पुणे.

Leave a Comment