सचिनच्या कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो

उभ्या महाराष्ट्राला व देशाला सचिनच्या या कामगिरीचा सार्थ अभिमान वाटतो. महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्यावतीने सचिन तेंडुलकरचे त्याच्या नव्या विश्वविक्रमाबद्दल मन:पूर्वक अभिनंदन करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सचिनला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या शुभेच्छा संदेशात त्यांनी सचिन तेंडुलकरने झळकविलेल्या ५० व्या कसोटी शतकाने या विक्रमवीराच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला असल्याचे म्हटले आहे. शतकांच्या या अर्धशतकाबरोबरच कसोटी क्रिकेटमध्ये १४००० धावा. एकदिवसीय सामन्यातील ४६ शतके असे अनेक विश्वविक्रम सचिनने नोंदविले आहेत. जगातील कोणत्याही खेळाडूला सचिनच्या या विक्रमाची बरोबरी करणे येणार्‍या कित्येक वर्षात कदाचित शक्य होणार नाही.

सचिनने दाखवलेली जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रण घेण्याची त्याची वृत्ती निश्चितच वाखाणण्याजोगी आहे. पण त्याचबरोबर त्याच्या स्वभावातील विनम्रता व औदार्य हे गुण त्याच्या चांगल्या मनुष्यत्वाचे द्योतक आहे. सचिनने तरूण पिढीसमोर एक मोठा आदर्श घालून दिला असल्याची भावना त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे.