करणें तें अवघें बरें

आपल्याकडील सर्व संतात- किंबहुना आपल्या परंपरेतील सर्व विचारवंतांत तुकाराम महाराज त्यांच्या वेगळेपणाने उठून दिसतात. तुकाराम महाराज अध्यात्म, परमार्थ या विषयावर बोलतातच, पण व्यावहारिक गोष्टींबद्दलही ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या सूक्ष्म आणि मार्मिक व्यवहारज्ञानाबद्दल अचंबा वाटू लागतो. आपण तुकोबांना ओळखतो ते त्यांच्यापाशी व्यवहारज्ञान विशेष नव्हते, अशा चुकीच्या समजुतीने ! तुकोबांनी कोकणात मीठ विकायला नेले आणि कोकणातून मिरची घाटावर आणली, अशासारखे जे किस्से सांगितले जातात ते केवळ कपोलकल्पित आहेत. तुकोबांचे व्यावहारिक गोष्टीत मन गुंतलेले नव्हते हे खरे, पण त्याचा अर्थ ते व्यावहारिक तसेच प्रापंचिक ज्ञानात अगदीच ढ होते, असा नव्हे. त्यांनी विविध अभंगातून जो उपदेश केला आहे, जे मार्गदर्शन केले आहे ते इतक्या वरच्या दर्जाचे आहे की, नित्यनैमित्तिक व्यवहारज्ञानातले बारकावे अवगत असल्याशिवाय कोणीही इतके तपशीलवार बोलू शकणार नाही. आता हाच अभंग पाहा ना, हालवूनि खुंट। आधीं करावा बळकट ।। मग तयाच्या आधारें । करणें ते अवघें बरें ।। सुख दु:ख साहे । हर्षामर्षी भंगा नये ।। तुका म्हणे जीवें । आधीं मरोनि राहावें ।। तुम्ही ज्या खुंटीच्या आधारे काही काम करणार असाल, ज्या खुंटीला आपल्या ओढाळ मनाचें वासरु बांधणार असाल ती खुंटी आधी मजबूत असली पाहिजे. ती खुटी मजबूत असली की, तिच्या आधारे पुढील सर्व वागणे-सवरणे सोपे होते आणि ही खुंटी बळकट असली की, सुख-दु:खाची वा शोक अथवा आनंदाची फारशी तमा वाटत नाही. व्यवहारात, घराघरात, संसारात काही महत्त्वाचे आधार आवश्यक असतात. तपासून आपण आपल्या वागण्याची दिशा आणि पद्धती ठरविली पाहिजे. आपला नेमका अधिकार काय, आपली जबाबदारी काय ? याचा नीट विचार करुन वागत गेले की, सुखाच्या आणि आनंदाच्या प्रसंगात तसेच संकटाच्या किंवा चिंतेच्या काळात मनाचा समतोल ढळणार नाही .

कोणत्याही परिस्थितीत मन शांत, समाधानी राहू शकते आणि मन असे असल्याशिवाय तुम्हाला अंगीकृत कार्यात अपेक्षेप्रमाणे काम करता येणार नाही. मन प्रसन्न असेल, समाधानी असेल, तर आणि तरच तुम्ही हाती घेतलेल्या कामात स्वत:ला झोकून देऊ शकता. शेवटच्या चरणात तुकोबा सांगतात, तुका म्हणे जीवें आधीं मरोनि राहावें ।। मरोनि राहावे म्हणजे काय ? मेल्यानंतर कोण राहाणार ? अहो, इथे तुकोबांना ते मरण अभिप्रेत नाही. तुकोबा सांगतात. जिवाला म्हणजे आपल्या मनाला. अंत:करणाला, कशाचीही अपेक्षा-आकांक्षा न ठेवता जगण्याची सवय लावा. आपल्या आशा-आकांक्षा नष्ट झाल्या की मग बेधडकपणे वागणे शक्य होते. ज्या सरकारी अधिकार्‍याला स्वत:च्या मनाप्रमाणे वागावयाचे असेल, स्वत:च्या मनाप्रमाणे लोकांच्या उपयोगी पडावयाचे असेल तर त्याने आपले मन लाच म्हणून मिळू शकणार्‍या पैशामध्ये गुंतविता कामा नये. आपल्याला इतके पैसे मिळाले पाहिजेत, अशी आकांक्षा मनात ठेवता नये. तसा जर तो मनाशी वागला तरच तो निर्भीडपणे व्यवस्थित स्वत:चे काम करु शकेल. समजा, कोणी सरकारी अधिकारी आहे, त्याने प्रथम आपले स्थान, आपली खुर्ची स्थिर करुन घेतली पाहिजे. कोणीही यावे आणि टिचकी मारुन जावे, अशी अवस्था राहू देता कामा नये. मग ते काही करावयाचे असेल ते सहजपणे करणें तें अवघैं बरें असे होते आणि स्थानाच्या भक्कमपणाची जाणीव झाली की मग तुम्ही त्या भक्कमपणावर विसंबून पुढचे पाऊल टाकू शकता.

तुकोबांनी अवघ्या चार चरणांच्या अभंगात व्यवहारज्ञानाचे सार आपल्यासमोर मांडले आहे. येथे उदाहरणादाखल आपण सरकारी अधिकार्‍याचा विचार केला. पण कोणत्याही कामात आपले स्थान, आसन निश्चित करुन घेऊन मग पुढचे पाऊल टाकावे. म्हणजे मनाला समाधान लाभते आणि कामही आपल्या इच्छेप्रमाणे होऊ शकते. आता स्थान बळकट कसे करावे, त्याचा विचार तुकोबांनी अन्यत्र केला आहे.

  • ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर
  • सौजन्य महान्यूज

    Leave a Comment