विद्यार्थी वाहतूक सेवा

school-bus
आपली जगण्याची पद्धत बदलत आहे आणि त्यानुसार नव्या गरजा निर्माण होत आहेत. त्या गरजांमधूनच अनेकानेक साधे वाटणारे परंतु चांगला पैसा मिळवून देणारे उद्योग उभे रहात आहेत. आपण थोडे डोळे उघडे ठेवून या गरजा आणि हे उद्योग पाहिले तर आपल्याला त्यातून आपल्या आवडीचा एखादा बिन भांडवली उद्योग सापडू शकतो. पूर्वी मोठ्या शहरांमध्ये मुले स्कूल बस किंवा सामूहिकपणे कंत्राट केलेली खाजगी वाहने यातून मुले शाळांना जात होती. पण आता मुलांच्या वाहतुकीचे हे प्रश्‍न केवळ मोठ्या शहरातच नव्हे तर लहान-मोठ्या सर्वच शहरांमध्ये निर्माण झाले आहेत. महाराष्ट्रात महापालिका असलेल्या शहरांची संख्या २७ आहे. म्हणजे एवढी महानगरे आहेत. या महानगरांचा हा प्रश्‍न आहेच, परंतु अनेक मध्यम आधाराच्या शहरात सुद्धा पालकांना ही समस्या भेडसवायला लागली आहे. मुले स्कूल बसने शाळेत जातात, परंतु मुलांना घेऊन जाणारी स्कूल बस ही प्रत्येकाच्या दारात थांबत नाही. त्या बसगाड्यांचे काही ठराविक थांबे ठरलेले असतात आणि त्यामुळे अनेक मुलांना कमीत कमी एक-दोन फर्लांग तरी चालत जाऊन बस पकडावी लागते.

एकदा स्कूल बस ठरवून दिली आहे त्यामुळे मुलाच्या शाळेत जाण्याचा प्रश्‍न सुटला आहे असे म्हणून पालक सुटकेचा नि:श्‍वास टाकत असले तरी घरापासून बस थांब्यापर्यंत नेऊन सोडण्याची व्यवस्था करावी लागते. विशेषत: एलकेजी, यूकेजी पासून ते चौथी-पाचवीपर्यंतच्या मुलांपर्यंत सर्वांना घरापासून बस थांब्यापर्यंत नेऊन सोडण्याचा प्रश्‍न उपस्थित होतो. मुलाचे आई आणि वडील दोघेही नोकर्‍या करत असतील आणि घरात आजी-आजोबा नसतील तर मुलांना बस थांब्यापर्यंत कोण नेऊन सोडावे आणि परत आल्यानंतर बस थांब्यापासून घरापर्यंत कोणी आणावे हा प्रश्‍न सतावत असतो. कारण नोकरी करणार्‍या आई-वडिलांना हे काम शक्य होत नाही. अनेक पालकांना या एका कामासाठी वेगळी माणसे नेमावी लागतात. स्कूल बसचे पैसे तर भरावे लागतातच पण बस थांब्यापर्यंत नेणे आणि बस थांब्यापासून घरी परत आणणे या कामासाठीही माणूस नेमून त्याला पैसे द्यावे लागतात. यातच अनेक तरुण मुला-मुलींचा स्वयंरोजगार लपलेला आहे. तेव्हा उगाच नोकरीसाठी व्यर्थ प्रयत्न करणार्‍या मुला-मुलींनी थोडी कल्पकता दाखवून आपल्या भागातल्या अशा पालकांशी संपर्क साधला तर त्यांना महिन्याकाठी चांगली कमाई होऊ शकते. मुंबईत आणि पुण्यामध्ये केवळ एवढ्या कामासाठी एका मुलामागे महिन्याला अडीचशे ते तीनशे रुपये घेतले जातात.

ही समस्या केवळ शहरांचीच आहे असे नाही. काही गावांमधून सुद्धा ती उद्भवलेली आहे. महाराष्ट्राच्या भरपूर बागायती शेती असलेल्या भागात लोक गावात न राहता शेतांवर वस्ती करून तिथे रहायला लागले आहेत. अशा लोकांना सुद्धा मुलांना शेतातल्या वस्तीपासून बस थांब्यापर्यंत नेऊन सोडणे आणि बस थांब्यापासून वस्तीपर्यंत परत आणणे ही समस्या भेडसवायला लागली आहे. ग्रामीण भागातल्या मुलांना ही एक रोजगार संधी आहे. तिचा फायदा घेऊन त्यांनी पालकांशी संपर्क साधून मुलांना सुखरूप घरी आणून सोडण्याची हमी दिली तर त्यातून एक उत्तम व्यवसाय उभा राहू शकतो. या व्यवसायासाठी कसलीही भांडवली गुंतवणूक करावी लागत नाही. लोन काढावे लागत नाही, कसलाही परवाना घ्यावा लागत नाही आणि कोणासमोर हात पसरण्याचीही गरज नाही. लोकांची गरज ओळखून आणि धीटपणे त्यांच्याशी संपर्क साधून हा व्यवसाय मिळवता येतो. शिवाय या मुलांना सुखरूपपणे घरी आणून सोडले आणि विश्‍वास निर्माण केला तर व्यवसाय वाढू शकतो. अशा व्यवसायातून चांगली प्राप्ती व्हायला लागली तर मुलांची ही वाहतूक करण्यासाठी या व्यवसायात गुंतलेला तरुण स्वत:ची दुचाकी गाडीही ठेऊ शकतो आणि त्यातून आपल्या कामाची व्याप्ती वाढवू शकतो. मात्र हा व्यवसाय उत्तम रितीने करण्यासाठी मुलांच्या शाळेत जाण्याच्या वेळा, बसच्या वेळा, शाळा सुटण्याच्या वेळा आणि बस थांब्यापर्यंत बस येण्याच्या वेळा या सगळ्या गोष्टींचे संवेदनशीलतेने भान ठेवावे लागते. शेवटी ही एक सेवा आहे आणि सेवेशी संबंधित असलेल्या व्यवसायाला भांडवलाची गरज नसली तरी अतीशय गांभीर्याने आणि संवेदनशीलतेने व्यवसाय करणे हे आवश्यक असते. शिस्त आणि गांभीर्य या जोरावर व्यवसाय छान वाढू शकतो.

Leave a Comment